गुरुवार, ७ मार्च, २०१९

एक दिवस. . .

अंधाराचे मखमली पांघरूण अलगद दूर करत दिवस नुकताच कूस बदलत होता. एक अलवार निरागस शांतता आसमंतात काठोकाठ भरून राहिली होती. रात्रीच्या वाडग्यात पडलेले नक्षत्रांचे दान कधीचे झिरपून गेले होते.

 एक पक्षी प्रसन्नपणे किलबिललाआणि भाग्यवान ललाटावर नियतीची अक्षरे उमटावीत, तशी एक नवी कोरी ताजी पहाट हळूहळू क्षितिजावर उमटू लागली.

 ***
सकाळ होत गेली. दिवस उगवत गेला. दिवसाचं हे बाळरूप अपार उत्सुकतेने जग जाणून घेऊ लागलं. जिवाशिवाची जोडी होती, तोवर सगळा आनंदच भरून राहिला होता. मग त्याला "मी" आणि बाकीचं सगळं, असं पण कळू लागलं. एक एक नवीन अनुभव पोतडीत जमा होऊ लागला. आता दुःखाचीही अधूनमधून हजेरी लागू लागली.  
सुखदुःखाची आंबटगोड चव घेत दिवस रुळू लागला होता. कसल्याशा लगबगीने उबदार सकाळ पुढे चालू लगली. दुपारची लख्ख उन्हे तिला साद घालीत होती. 
पण सकाळ सरता सरता काही वेगळंच घडू लागलं. काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी मन आणि शरीर अधीर होऊ लागलं. बालपणाचं कोवळं बंधन आता रुचेनासं झालं होतं. अन् मग अशातच तारुण्याचा मेघ गर्जत बरसत आला. नवरसांच्या वर्षावाची मग सवय होऊ लागली. तनमन हिरवंगार घेऊनच दिवसाने दुपारच्या दालनात प्रवेश केला. 
***
इथं सूर्य झगमगत होता. अंगात भरपूर जोम होता. कर्तृत्वाला अथांग आकाश मोकळं होतं. उत्साह उतू जाऊ लागला.साथीसोबती मिळू लागले. सप्तरंगी स्वप्नांचा रथ सत्याच्याही मार्गावर विहरू लागला.
 दुपार आणखी थोडी मार्गस्थ झाली, अन् दिवसाला भान आले. डोक्यावरचा सूर्य परिस्थितीचे चटके देऊ लागला. तरीही समोर येणार्या सगळ्या जबाबदार्या, सगळी आव्हाने आपल्या समर्थ खांद्यांवर पेलून घेत त्याचा प्रवास चालूच राहिला. कधी यशाचं दान पडंत गेलं, तर कधी निराशेचं दान अपयशाला द्यावं लागलं. या सगळ्यातूनच कळत नकळत  शाखा विस्तारू लागल्या. फुलू फळू लागल्या. दिवस पिकू लागला.  अधूनमधून घडून गेलेल्या गोष्टी आठवू लागत. दुरावलेल्यांच्या स्मृतींचे सल पुन्हा पुन्हा हलकेच ताजे होत. कशाची समजू नये, पण हुरहुर लागून राही.
एकदा असंच त्याच्या लक्षात आलं, अरे, ही तर सांजेची चाहूल आहे. 
***
मग त्याचं मन सगळा ताळेबंद मांडू लागलं. उत्तर आलं, आता यापुढे खरंखुरं जगायचंय. मग एक एक ओझी हलकेच उतरवायला त्याने सुरुवात केली. प्रखरता गेली, सौम्यपणा आला. कठोरपणा विरघळून मार्दव आले. मन हृदय विशाल होत गेले. मग संध्येचे रंगही तनामनात सामावू लागले. सुखाचे असे अनेक क्षण येत राहिले, जात राहिले. 
आणि मग ती वेळ जवळ आली. 
***
बाहेरचा गलबला केव्हाच बंद झालेला. मनातला कोलाहलही संथपणे थंडावू लागला. आठवणींचे सगळे ठसे अलगद पुसून गेले. पिंडाची पाटी पुन्हा एकदा कोरी झाली. एका अनाहत नादाची अनुभूति आसमंतात पुन्हा एकदा जाणवू लागली. आणि जोडीला तीच लोभसवाणी शांतता. 
मिटल्या डोळ्यांनी त्याने ती शांतता मन भरून ऐकून घेतली, आणि थकला भागला कृतार्थ दिवस त्या अथांग स्थिर गाढ रात्रीच्या कुशीत शिरण्यासाठी सिद्ध झाला.
उद्या पुन्हा नव्याने उगवण्यासाठी.

***



१८ टिप्पण्या:

  1. रोज उगवणाऱ्या दिवसाचे इतके सुंदर वर्णन असू शकतं ?
    कमाल आहे. खूप सुंदर लिहिलंय 👌🏻

    उत्तर द्याहटवा