गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

रसग्रहण (हायकू)

मी तिच्यासह-
क्षितिजावर शांत,
रम्य एकांत.

डॉ. सुधीर काटे.

फक्त सहा शब्दांची, तीनच ओळींची छोटीशी हायकू. एका हळव्या कवीची तितकीच हळवी कविता. 
वरवर पहाता, रम्य एकांतात शांत बसलेली प्रेमिकांची एक छानशी जोडी आपल्याला दिसते. 
पण 'क्षितिजावर ' या शब्दापाशी आपण जर अडखळलो, तर संपूर्ण कविता एकदम झळाळून उठते. विजेसारखी चमकून जाते.
असं काय आहे या एकाच शब्दात ?

क्षितिज-
सागरकिनारी , नदीतिरी, तरुतळी, डोंगरकड्यावर, अशा निसर्गरम्य ठिकाणांवर प्रेमीजन एकांत मिळविण्यासाठी जातात. तिथे निवांत, शांत बसून दूरवर क्षितिज पहात असतात. त्यांना क्षितिज दूरवर  दिसत असते. 
कवीचा हा एकांत मात्र थेट क्षितिजावरच आहे. त्यामुळे क्षितिज दूर न रहाता, कवितेने आणि कवीने एकदम उंची गाठलीय, थेट अवकाशाची.
क्षितिजावर कोण असतं ?
क्षितिजावर कोण दिसतं ?
क्षितिजावर कोण भेटतं?

चंद्र, सूर्य, तारे, संध्या, उषा.....
निसर्गनाट्यातली ही पात्रं .
चंद्र आणि सूर्य, उगवताना आणि मावळतानाच फक्त क्षितिजावर दिसतात. यावेळी त्यांचे रूप रम्य, सौम्य, स्नेहल, आरक्त असे असते.
ही आरक्ती अनुरक्ती आहे. एकांतातला हा अनुराग आहे.

तिच्यासह-
चंद्र रोहिणीसह, सूर्य संध्येसह, तसेच सूर्य उषेसह. अशा या जोड्या. 

एकांत-
इतर सर्वांपासून दूर, म्हणजे एकांत . इथे तर पृथ्वीपासून दूरचा हा एकांत दिसतो. किती दूर ?
आंतर प्रकाशवर्षात मोजण्याइतके. कुठल्या उपद्रवाचा  संभवच नाही. हा खरा एकांत.

शांत-
चंद्र तर शांत, शीतलतेचेच रूप. सूर्यही क्षितिजावर असण्याच्या वेळी, सकाळी आणि सायंकाळी शांतच असतो. यांच्या शांत असण्याने, बाकी आसमंतात मात्र बरेच काही सुखद घडत असते. 

तो तिच्यासह एकांतात आहे, आणि दोघेही शांत आहेत, तर ही नक्कीच मीलनानंतरची तृप्त शांतता आहे. 

रम्य-
सर्व उपाधींपासून दूर, फक्त आपल्या 'तिच्यासह' असल्याने, या दोघांचा एकांत रम्य असणारच.  
चंद्र रोहिणी, सूर्य संध्या, तसेच सूर्य उषा या जोड्यांना क्षितिजावर साक्षी ठेवून पृथ्वीवरील जे प्रेमीजीव एकांतात भेटतात, त्या सर्वांचाही एकांत या क्षितिजवासींनी किती रम्य करून टाकलाय!

मी-
या पहिल्याच शब्दात कवीचा आत्मविश्वास दिसतो.
' मी ' च्या अस्तित्वामुळे क्षितिजावरची ही भव्य निसर्गनाट्ये घडलेली आपण पाहू शकतो. चराचराशी एकरूपता, मी आणि निसर्ग वेगळे नाही, ही भावना, ' मी ' ही व्यक्ती न रहाता एक भावना, एक काव्य बनून जाते. 

केवळ ५- ७- ५ अक्षरांच्या तीन ओळींमध्ये एक नाही, दोन नाही, तर तीन तीन भव्य निसर्गचित्रे, भावनाचित्रे  दाखवली.

एकांतातील भेटीसाठी क्षितिज निवडताना इथे आणखीही अर्थ असू शकेल.
इथे जगताना घडू न शकलेली भेट जगण्यानंतर तर घडत नसेल ?
असीम एकांतात, असीम शांततेत, असीम रम्यतेत!

क्षितिज हा एक भास आहे. 
आकाश जमिनीला मिळाल्यासारखं दिसतं, पण प्रत्यक्षात ही भेट कधीच घडत नसते. 
फक्त आभास. 
तिच्यासह असलेला हा रम्य एकांत पण फक्त कल्पनेतला, आभासी तर नाही ?

सहा शब्दांच्या तीनच ओळींमध्ये एवढं ब्रह्मांड !
सलाम त्या कवीला !

                             ***




गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

महामानव बाबा आमटे आणि त्यांचे सर्व समर्पित कुटुंबीय यांच्याबद्दल आता नवीन सांगण्यासारखे काही नाही. किंबहुना जेवढे बोलावे तेवढे कमीच.
सलग तिसर्या पिढीने एकच कार्य, ते ही समाजकार्य, मनःपूर्वक पुढे नेणे, अध्याहृत असल्याप्रमाणे एक एक अशक्य जबाबदार्या स्वतःहून अंगावर घेणे, आणि बेफाट प्रयत्नांनी तन मन आणि धनापेक्षाही खूप अधिक काही  देऊन त्या यशस्वीपणे पार पाडणे, यांत सातत्य ठेवणे असे उदाहरण जगात इतरत्र दिसणे कठिण.
आनंदवन, लोकबिरादरी प्रकल्प, सोमनाथ प्रकल्प, नागेपल्ली प्रकल्प, हेमलकसा प्रकल्प, आणि अगदी नवीन असे विदर्भातील झरी जामणी येथे सुरु केलेले काम, ही सर्व शून्यातून उभी केलेली तीर्थक्षेत्रे आहेत.
हे सर्व कुठून सुरू झाले, का सुरू झाले, कसे कसे होत गेले, आणि आज काय चालू आहे, यांबद्दल स्वतः  या दोन सुपुत्रांनी लिहून ठेवले आहे. "प्रकाशवाटा" हे समर्पक नाव घेऊन मा. डॉ. प्रकाश आमटे यांनी हेमलकसा जंगल आणि आदिवासी यांच्या कायाकल्पावर प्रकाश टाकला आहे, तर मा. डॉ. विकास आमटे यांनी बाबांचे काम पुढे नेताना केलेल्या विस्मयकारी प्रयोगांची माहिती "आनंदवन प्रयोगवन" या पुस्तकामधून दिलेली आहे.
हेमलकसा येथील प्राण्यांचे अनाथालय कसे सुरू झाले, त्यावरील तथाकथित जप्ती, आणि त्यांतील असंख्य चमत्कारसदृश घटना यांची चित्तथरारक चित्रकथा श्री. विलास मनोहर यांच्या नेगल, नेगल २, तसेच रानमित्र या डॉ. प्रकाश आमटे यांच्या पुस्तकांमधून पहाता येते.
याचबरोबर "समिधा" (सौ. साधना आमटे यांचे आत्मचरित्र), तसेच पु. लं. नी बाबा आणि आनंदवनावर लिहिलेले लेख, तारा धर्माधिकारी आणि भ. ग. बापट यांनी लिहिलेली बाबांची चरित्रे, स्वतः बाबांची  "ज्वाला आणि फुले", "उज्ज्वल उद्यासाठी" हे ही नजरेखालून घालता आलं, तर
काजळमाया, पिंगळावेळ, आणि अशाच अनेक गूढगहन पुस्तकांमधून जी.ए. आपल्याला भेटतात. त्यांच्या एकांतप्रीय स्वभावामुळे हे गूढतेचे वलय शेवटपर्यंत कायम राहिले होते.
पण "माणसे, अरभाट आणि चिल्लर" मधे त्यांच्या नेहमीच्या  वेगळ्याच पातळीवर अस्तित्वात असलेल्या जगातून ते आपल्या जगात आल्याचे जाणवले होते.
"बखर बिम्मची" (बिम नाही हं, बिम्म. ) हे पुस्तक वाचल्यानंतर  अनेक जी. ए. प्रेमींप्रमाणेच मलाही सुखद धक्का बसला.
आपल्या कथांमधून मेंदूला झिणझिण्या यायला लावणारे जी.ए. , हे इतकं लोभस, इतकं निरागस, इतकं छान, सोपं लिहू शकतात!
अर्थात हे पुस्तकही आपला संपूर्ण कब्जा घेतेच.
मुखपृष्ठावरील, चित्रकार शाम जोशींचे चित्र पाहून हे लहान मुलांचे पुस्तक असल्याचे समजते, आणि ते खरेही आहे.
पण मुलांइतकाच मोठ्यांचाही हा बिम्म एकदम लाडका बनून जातो.
अंदाजे ३ - ४ वर्षांचा बिम्म, त्याची शाळेत जायला लागलेली बहिण बब्बी, या दोघांची आई, परगावी असलेले बिम्मचे वडील, बब्बीच्या मैत्रिणी, रिकाम्या घरासमोर भेटणारे आजोबा, एक गाय, एक हत्ती, बाबांचे पत्रं, आणखी असाच काय काय , बराच गोतावळा आहे इथे.
बिम्मच्या नजरेतून, त्याच्या चिटुकल्या, पण तरीही अफाट जगाची आपण सफर करुन येतो.
आजोबांनी बिम्मलाच पतंग म्हणून उडवल्यावर आपण पण हलके होऊन त्याच्याबरोबर उडू लागतो.
बाबांचं पत्रं खरोखरीच आल्यावर आईबरोबर आपलेही डोळे पाणावतात.
गाय काय काय खाते, आणि मग काय होते, हे ज्ञान तर एकदम भारी.
हत्तीबरोबरचा एक दिवस मज्जाच मज्जा.
आणि रिकाम्या घरातल्या शिपायाचा तोरा एका वाक्यात बिम्म कसा उतरवतो, हे तर वाचायलाच पाहिजे.
जी.एंच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे वास्तव आणि आभास यांची सरमिसळ झालेली इथेही आहे. पण ती छोट्यांच्या जगात इतकी बेमालूम सामावलीय, की जबरदस्तच.
मला खूप आवडलेले हे पुस्तक आहे.
"वाचू आनंदे" ही चार पुस्तकांची पुस्तकमाला आहे. माधुरी पुरंदरे आणि नंदिता वागळे यांनी अतिशय परिश्रम करून या चार भागांची निर्मिती केल्याचे वाचताना वारंवार जाणवत रहाते.
रूढ पुस्तकांपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारची, आणि वाचनीय बरोबरच अतिशय प्रेक्षणीय अशी ही पुस्तके हातात घेतल्यावर खिळवून ठेवतातच.
मराठीतील अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध जुन्या नव्या लेखक, कवींच्या उत्तमोत्तम कलाकृतींमधील काही भागांचे संकलन- असे यांचे  सर्वसाधारण स्वरूप सांगता येईल.
पण हे एवढेच नाही. पुस्तकांचे देखणेपण वाढवणारी आणखी एक गोष्ट, म्हणजे त्यातील फोटो, आणि चित्रे. भारतातील अनेक प्रांतांमधील शिल्पांचे, तैलरंग, जलरंगांतील चित्रांचे, लोकचित्रकलेचे, असे चोखंदळपणे निवडलेले अनेक फोटो रसिकमनाची तृप्ती करतात. योग्य त्या जागी विषयानुरूप केलेली त्यांची योजना साहित्याची रुचीही वाढवते. आपल्याकडे कलांचा केवढा समृद्ध वारसा आहे, हे जाणवून मन थक्क होते. (आणि हे सर्व फोटो रंगीत असते तर - - असेही वाटत रहाते.)
चारपैकी दोन भाग कुमारांसाठी, आणि दोन बालवाचकांसाठी, असे म्हटले असले, तरी सर्व वयांचे वाचक यांचा आनंद घेऊ शकतात. कारण, दर्जा, आणि उत्तम तेच निवडणे हे सूत्र सांभाळले आहे.
एकदा वाचायला सुरु करून सलग वाचून संपविण्याच्या प्रकारातली ही पुस्तके नाहीत. केव्हाही, कुठलाही भाग उचलावा, अधले मधले काहीही वाचावे, आणि आनंद घ्यावा.
 बाल आणि किशोर गटातील वाचकांसाठी ही एक शोकेस, किंवा संपादिकेच्या म्हणण्यानुसार, किलकिली केलेली एक खिडकी आहे. खजिन्याकडे जाणार्या अनेक वाटांपैकी एका वाटेवर या दोघींनी वाचकांना आणून सोडले आहे.
यामुळे वाचनाची भूक भागणार नाही, तर चाळवणार आहे. चांगले साहित्य कसे असते, हे कळले, की काय वाचावे, याची समज आपोआप वाढत जाते.
संपादकीय/ प्रस्तावनाही वाचनीय आहे.
कुठल्या लेखक /कवींचे साहित्य निवडले, यांचे उदाहरण द्यायचे, तर सगळ्यांचीच नावे घ्यावी लागतील, कारण टाळण्यासारखे काही नाहीच. यासाठी एका अनुक्रमणिकेचा फोटोच देत आहे. उदाहरणार्थ.
प्रत्येकाच्याघरात संग्रही असावीत अशी ही पुस्तके आहेत.
पुढील भागही अपेक्षित आहेत.
रमा खटावकर .
२०१६ या वर्षाचा शेवट, आणि २०१७ची सुरुवात.
आदर्श, विकास आणि श्रीकृष्ण ही तीन विशीच्या आसपासची मुले आपल्याच आदिवासी बांधवांच्या जीवनाबद्दल उत्सुकता मनात धरुन सायकलवरुन प्रवास सुरू करतात. आपलेच लोक आपल्याच विरुद्ध बंदुका रोखत नक्षलवादी का होतात, हा त्यांना पडलेला आणखी एक प्रश्न. तो सोडवण्यासाठी भामरागडच्या पलिकडे, छत्तिसगढच्या प्रत्यक्ष नक्षली भागात, सगळ्यांच्या सूचना झुगारून ते सायकली दामटतात. मग बातमी येते, की तीन मुलांना नक्षलवाद्यांनी पकडले.
चार दिवसांनंतर त्यांची नाट्यमय रितीने सुटका केल्याच्या पण बातम्या झळकतात.
हे नक्षल्यांच्या कैदेतले चार दिवस, आल्यानंतर ते शब्दबद्ध करतात.
साधना प्रकाशन " तीन मुलांचे चार दिवस" या नावाने याला पुस्तकाचे रूप देते,
एकच अनुभव, तिघांच्या नजरेतून.
असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
या वयातल्या शहरी मुलांना सुटीत असे काही करावेसे वाटणे, हीच खूप मोठी गोष्ट आहे.
तिघेहीजण मुळात लेखक नसल्याने, आपल्या अकृत्रिम शैलीत, डायरी लिहावी तसे हे लेखन त्यांनी केले आहे. आणि हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे.
या सफरीमधली अनेक छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
मुखपृष्ठावरील तिघांचे बोलके चेहरेच खूप काही सांगून जातात. त्यांची प्रगल्भता, जिद्द, उत्साह, आणि सकारात्मकता हे सगळे चेहर्यावर दिसते.
आजच्या तरुणाईविषयी जे लोक निराश आहेत, त्यांच्यासाठी आशेचा किरण आणण्याचे काम हे पुस्तक नक्की करेल.
संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रस्तावनेत या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास सांगून रोचकता आणखी वाढवली आहे.
वृत्तपत्रांतील कात्रणे, मुलांनी बनवलेल्या नकाशाचे छायाचित्र, अशा गोष्टी पण यात समाविष्ट केल्या आहेत.
त्यामुळे आपण एक सत्यघटना वाचत आहोत, याचा क्षणभरही विसर पडत नाही.
थोडक्यात म्हणजे ज्यांनी अजून वाचले नाही, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे.
(रसग्रहण- रमा खटावकर.)
या दोनही पुस्तकांचा परिचय द्यायची खरंतर काही गरजच नाहीये.
छापिल स्वरुपात आहेत, म्हणून पुस्तकं म्हणायचं, नाही तर स्वयंपाकघरात प्रयोग करणार्या प्रत्येकाला आपली आई, आजी, किंवा जवळचं कुणीतरी आधाराचं असल्यासारखं वाटतं, ही पुस्तकं घरात असली की.
२८ च्या वर आवृत्या निघाल्यात.
कै. कमलाबाईंची प्रस्तावना पण खूप छान आहे.
त्यांनी आपल्या सासूबाईंकडून हे  सगळं शिकून घेतलं. प्रत्येक पदार्थ स्वतः बनवून, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी त्यात बदल करून प्रमाणं ठरवून, मगच पुस्तकात समाविष्ट केला आहे.
विशेषतः पहिला भाग जास्त उपयोगी वाटतो. रोजच्या वापरातले खास मराठी वळणाचे पदार्थ , यात साध्या भाताच्या प्रकारांपासून वरण, आमट्या, भाज्या, असं सगळं आहे. जसं सांगीतलंय, अगदी तसंच करत गेलं , तर हमखास यशाची खात्रीच.
स्वयंपाकघरात वावरण्याची सवय नसलेल्या नवविवाहितांना याचा उपयोग होतोच, पण अनुभवी सुगरणींना देखील यात दरवेळी काहीतरी नवीन सापडतेच.
साठवणीचे पदार्थ, मधल्या वेळचे पदार्थ, मुरांबे, लोणची, अन्य प्रादेशिक पदार्थ , पक्वान्ने, उपासाचे पदार्थ असे वेगवेगळे विभाग यात आहेत.
भाषा साधी, सोपी, सहज कळेल अशी.
मापासाठी वाटी आणि चमचा ही व्यावहारिक साधनेच आहेत. त्यामुळे दीड इंच आलं, किंवा इतके ग्रॕम रवा,असला काटेकोरपणा  नाही.
हे पुस्तक मी फाटेपर्यंत वापरलं, नंतर बाईंडिंग करुन वापरलं. माझ्या आईला पण यातले खूप संदर्भ उपयोगी पडले. आता माझ्या सुनांना पण कमलाबाईंचा आधार आहे.
बाजारात पाककलेची असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत, पण यासम हेच.
"ही आठ मुलं, म्हणजे नियतीनं आईला घालून ठेवलेली आठ कोडी. "
या एका वाक्यात "करुणाष्टक" चं सगळं सार सामावलं आहे.
खेड्यात वाढलेली, गरीब ब्राह्मणाची मुलगी, तिचा शांत, गरीब स्वभावाचा पती, आणि एकामागून एक अवघड अवघड कोडी घालत जाणारी नियती.
ही सगळी कोडी सोडवण्यात त्या माऊलीचं आयुष्यच करुणाष्टक बनून गेलं.
'आधुनिक वाल्मिकी' म्हणून प्रसिद्ध झालेले गीतरामायणकार कविवर्य ग. दि. माडगूळकर , आणि लेखक, प्राणिप्रेमी, जंगल वाचक, रेखाचित्रकार, चित्रपट कथालेखक श्री. व्यंकटेश माडगूळकर , ही त्या माऊलीने महाराष्ट्राला भेट दिलेली दोन रत्ने.
लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या आईची जीवनगाथा , तिचे कष्टमय आयुष्य, मुलांच्या प्रगतिसाठी, आणि घरादाराच्या उत्कर्षासाठी तिची चाललेली तडफड, याबरोबरच शिकलेली नसूनही तिच्यात असलेला व्यवहारीपणा , आणि नवर्याच्या शांत, थंड स्वभावाचा परिणाम म्हणून की काय, तिच्यात आलेला तापटपणा, फटकळपणा, हे सारे "करुणाष्टक" या पुस्तकात चित्रित केले आहे.
समर्थ रामदासांनी प्रभूरामचंद्राला उद्देशून रचलेले, अतिशय कळवळून त्याची प्रार्थना करणारे आठ श्लोक हे करुणाष्टके म्हणून ओळखले जातात. अनुदिन अनुतापे -- अशी सुरुवात असलेले हे श्लोक आजही अनेक घरात म्हटले जातात. त्यातील जो भाव आहे, तो या सर्व कथनात भरून राहिला आहे.
माणदेशी माणसं, बनगरवाडी, सत्तांतर, वावटळ, अशा अनेक पुस्तकांतून आपल्याला त्यांच्या सहज, सोप्या, आणि मनाला थेट भिडणार्या शैलीची ओळख झाली आहे.
या पुस्तकात आपल्या आईबद्दल लिहिताना सर्व औपचारिकता गळून पडली आहे. एखाद्या देवळाच्या कट्ट्यावर, किंवा गावातल्या पारावर बसून आपल्याशी ते मनातल्या गोष्टी बोलत असावेत, इतकी सहजता या लेखनात आहे.
पुस्तक शांतपणे, त्याच गांभिर्याने वाचले, तर वेळोवेळी आईच्या आठवणीने भरून आलेले त्यांचे मनही आपल्याला समजू शकते.
आईच्या बरोबरीने या सर्वच भावंडांचे कष्टमय आयुष्य आपल्यासमोर येते. १९४७ च्या आसपासचा काळ डोळ्यासमोर उभा रहातो.
आपल्या मोठ्या बंधूंबद्दलही अतिशय संयमाने, ओघाने आले, तसे लिहिले आहे.
वडिलांबरोबर काढलेल्या दिवसांचेही खूप लोभस वर्णन आहे.
काही काही वाक्ये कायमची डोक्यात घुसून रहातात. जसे- -
"आणि स्वर्गातून देवदर्शन व्हावे, तसे विहिरीच्या काठावरुन डोकावणारे दादा मला विहिरीच्या तळातून दिसले. "
तसंच- -
"यानंतरही खाईत पडण्याचा उद्योग मी बर्याच वेळा केला, पण तेव्हा मला बाहेर काढायला दादा नव्हते."
या पुस्तकाचे मुखपृष्ठ, आणि आतली सर्व रेखाचित्रे त्यांची स्वतःची आहेत.
थोडक्यात म्हणजे, प्रत्येक मराठी पुस्तकप्रेमीच्या संग्रहात असायलाच हवे, असे हे पुस्तक आहे.